पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या बारावी, दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते १८ मार्च रोजी रात्री आठ वाजेपर्यंत पुणे ग्रामीण जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षाकेंद्राच्या परिसरात आणि त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात इतर कोणत्याही व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्राचे परिसरात दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रावर कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, गैरप्रकार होऊ नये, परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात येणार आहेत. या केंद्रावर परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी यांना आदेशातून सूट देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी बुथ, फॅक्स केंद्रे, छायाप्रती केंद्रे, ई-मेल इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, मोबाइल, प्रसारमाध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावीत. परीक्षा केंद्रांवर मोबाइल, वायरलेस सेट, ट्रॉझिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप असे इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रावर जवळ बाळगण्यास, परिसराचे १०० मीटर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास मनाई करण्यात येत आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रमाणे दंडास पात्र राहतील असेही या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
कॉपीमुक्त अभियान
राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्य मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा आवश्यक आहे, सीसीटीव्ही नसलेल्या परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल केली जाणार आहे. परीक्षाा केंद्रांवर ड्रोनद्वारे देखरेख, पोलिस बंदोबस्त, भरारी पथके, बैठी पतले अशा अनेक उपाययोना केल्या जाणार आहेत.

Post a Comment
0 Comments